राज्यातील नागपूर, अहमदनगर, यवतमाळ आणि वाशिम या चार जिल्ह्यांत इतर मागास वर्गातील विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृहे उभारण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
राज्यात ओबीसी प्रवर्गातील मुला-मुलींसाठी एकूण 36 शासकीय वसतिगृहांची निर्मिती होणार असून पहिल्या टप्प्यात मुलींसाठी ही चार वसतिगृहे उभारण्यात येत आहेत.
याअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी येथे 500 विद्यार्थिनी क्षमतेचे वसतिगृह उभारले जाणार आहे. तसेच वडगाव गुप्ता (अहमदनगर), उमरसरा (यवतमाळ) आणि वाशिम शहरात प्रत्येकी 100 विद्यार्थिनी क्षमतेचे वसतिगृह उभारण्यात येणार आहे.
यासाठी केंद्र सरकारकडून बाबू जगजीवनराम छात्र आवास योजनेंतर्गत ओबीसी प्रवर्गातील मुलांच्या वसतिगृहे निर्मितीसाठी ६० टक्के तर मुलींच्या वसतिगृहासाठी ९० टक्के अनुदान दिले जाते. याअंतर्गत 100 विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहाच्या निर्मितीसाठी ३ कोटी रुपये देण्यात येतात.